आज आपण शिक्षिका सौ.मनीषा रहाटे (एम.ए.डी.एड् )यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षिका सौ. मनीषा या पुणे येथे राहत असून सध्या त्या Global Indian International School (GIIS), Pune येथे कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांना एकूण २० वर्षांचा अनुभव आहे.
शिक्षिका मनिषा यांचे बालपण पुणे जिल्ह्यातील काळूस या गावी एका छोट्याशा शेतकरी कुटुंबात गेले आहे. आणि चौथी पर्यंतचे शिक्षण हे छोट्याशा द्विशिक्षकी शाळेत झालेले आहे.पाचवीत प्रवेश मिळविण्यासाठी त्यांना माध्यमिक शाळेत जावे लागले. माध्यमिक शाळेत गेल्यानंतर तिथे अनेक प्रकारचे मुले मुली शिक्षण घेत होते. त्या शिकत असलेल्या शाळेत अनेक आर्थिक स्तरातील विद्यार्थी तिथे होते. शिक्षकांच्या मुलां मुलींचे प्रमाण त्या शाळेत जास्त होते. आणि ह्या मुला-मुलींच्या पालकांच्या पण ओळखी तशा बऱ्यापैकी होत्या. त्यांच्यासारख्या गरीब शेतकरी कुटुंबातील आणि ज्यांच्या कुठेही ओळखी नाहीत अशा कुटुंबातील मुला-मुलींच्या अंगी अनेक गुण असून देखील पुढे कोणत्याही कला गुणांना वाव दिला जात नव्हता ही गोष्ट त्यांना प्रकर्षाने जाणवली . आणि तेव्हाच त्यांचा मनात विचार आला की जर त्या शिक्षिका झाल्या तर, असे गरीब घरातील विद्यार्थी आपल्या समोर असतील तर त्या नक्कीच अशा विद्यार्थ्यांना वंचित न ठेवता त्यांना त्यांच्यातील विविध कलागुण ओळखून त्यांना संधी प्राप्त करून देतील.त्याच वेळी त्यांनी खुप शिकून शिक्षक होण्याचा निर्णय घेतला.
शिक्षिका मनिषा यांच्या नोकरीची सुरुवात ही पुणे जिल्हा परिषद मधील मावळ तालुक्यातील कशाळ या गावी झाली. आणि या गावातील त्यांच्या हातून शिकलेली पहिली बॅच जेव्हा बारावीला चांगल्या गुणांनी पास झाली त्या वेळी ते सर्व विद्यार्थी त्यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी गेले होते. वेळेस विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आजही शिक्षिका मनिषा विसरु शकल्या नाहीत.
शिक्षिका मनिषा यांच्या मते, जो शिक्षक आज एक सुजाण नागरिक घडवतो त्या शिक्षकांकडे सध्या समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. आणि हे फक्त बोटावर मोजण्याइतक्या लोकांमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात याचा पडसाद उमटताना दिसतो.त्यामुळे शिक्षक जेव्हा शिक्षणक्षेत्रात ज्ञानदानाचे काम करतो त्यावेळेस त्याचे खच्चीकरण होते. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना विविध प्रकारे संधी उपलब्ध करून दिली जावी. त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक व्हावे. त्यांना पुढील कार्यासाठी प्रेरणा देण्यात यावी.
आज बऱ्याच ठिकाणी खेडे गावातील विद्यार्थी जिल्हास्तरापर्यंत क्रीडा स्पर्धा तसेच विविध संस्कृती स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करतात परंतु ह्या विद्यार्थ्यांचे जर महाराष्ट्र शासनाने शाळेतील उत्कृष्ट खेळाडू किंवा विविध कला गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा परिषदेकडून मागवली तर या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात शिकण्याची संधी मिळेल आणि असे विद्यार्थी बर्यापैकी गरीब कुटुंबातील असतात तर त्यांना मोफत ट्रेनिंग देऊन आज देशासाठी उत्कृष्ट खेळाडू देऊ शकतो. तसेच महाराष्ट्राला अनेक कलाकार पुन्हा नव्याने मिळू शकतात.
शिक्षक व्हायचे असेल तर निर्मळ, निस्वार्थी आणि समाजातील विविध स्तरातील विविध घटकांचे आपण काहीतरी देणे लागतो हा उद्देश ठेवून व्हावे’ असे शिक्षिका मनिषा यांना वाटते तसेच हेच जर काम आपण प्रामाणिकपणे केले तर आपल्याला आत्मिक समाधान निश्चितच मिळतेअसे ही त्या म्हणाल्या. तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध बाह्य घटकांकडून अपेक्षा न ठेवता जर काम केले तर कोणत्याही प्रकारे अडचण येत नाही.आणि बऱ्याच शिक्षकांकडे विविध कलागुण अंगी असतात परंतु ते विद्यार्थ्यांमध्ये उतरवण्यास कमी पडतात. स्वतःची डेव्हलपमेंट करत करत विद्यार्थ्यांचे डेव्हलपमेंट करणेदेखील गरजेचे आहे. असे ही मनिषा यांना वाटते.