S R Dalvi (I) Foundation

Tr. Yogesh Muley

Tr. Yogesh Muley

आज आपण श्री.  योगेश अरविंद मुळे ( B.Sc. Physics, M.A. Political Science, B.Ed.) यांच्या शिक्षक होण्यापर्यंतच्या प्रवास याबद्दल जाणून घेणार आहोत. मुळचे  मु. पो. पिरंदवणे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी इथचे असणारे श्री योगेश हे गेले ५ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते सध्या  मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड, ता.  संगमेश्वर, जि. रत्नागिरी.येथे शिक्षक म्हणून सेवा करत आहेत.

शिक्षण संपल्यावर शिक्षक होईन किंवा व्हावे याचा कधीच योगेश यांनी विचार केला नव्हता.एक मात्र खरे की ते शाळेत इ. नववीच्या वर्गात शिकत असताना दैनिक तरुण भारत मधील लहान मुलांसाठी येणारी ‘चॅम्पियन’ ही पुरवणी ते नियमित वाचायचे. त्याचवेळी त्यांनी याच माध्यमातून देशसेवा करण्याचे ठरवून टाकले होते. तेव्हा सैन्यदलात काम करणे म्हणजेच देशसेवा करणे असा त्यांचा समज झाला होता. त्यांनी त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू केले खरे पण यश प्राप्त झाले नाही. तेव्हा त्यांना APJ अब्दुल कलाम सर आठवले. पायलट होण्याचे स्वप्न उराशी कवटाळलेल्या कलाम सरांनी शास्त्रज्ञ होऊन देशाची सेवा केली. या गोष्टीने योगेश यांच्या ही दृष्टिकोनात हळूहळू बदल झाला. पण तेव्हा ही ते हा पेशा अंगीकारतील असे तेव्हाही त्यांना वाटले नव्हते. 2016 च्या जून महिन्यापर्यंत पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करणारे योगेश गावी येत असताना बाबांच्या मित्राच्या सांगण्यावरून शेजारच्याच न्यू इंग्लिश स्कूल वहाळ येथे मुलाखतीसाठी गेले . इयत्ता 10 वीच्या वर्गात 2 चलातील रेषीय समीकरणे हा पाठ शिकवला आणि त्यानंतर मग त्यांचे देशसेवा करण्याचे स्वप्न साकार झाले. आणि तिथूनच त्यांचा शिक्षक म्हणून प्रवास सुरु झाला.

शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी:
कोणत्याही क्षेत्रात नवीन पाऊल ठेवल्यावर अडचणी येणारच. योगेश यांच्या प्रवासात खरे तर अडचणी आल्या नाहीत तर नावीन्याचा अनुभव आणि आनंद मिळत नाही; असे त्यांचे मत आहे. त्यांना गणिताच्या अध्यापनात कोणतीही अडचण कधीच आली नाही. पण विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, त्यांना हाताळण्याच्या पद्धती आणि त्यांच्या बुद्धय़ांकातील फरक इत्यादी अडचणी अक्षरशः त्यांना झोप लागू देत नव्हत्या.

त्यासाठी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. बी. वाय. जाधव सर व मुख्याध्यापक श्री. आंबेकर सर यांनी त्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले. एकूणच परिस्थिती कशीही असली तरी आपली गाडी योग्य मार्गावर रहावी यासाठी शाळेतील सर्वांनी वेळोवेळी अपेक्षित सहकार्य केल्याने या क्षेत्रात काम सुरू केल्यावर येणार्‍या अडचणींची तीव्रता कमी झाली. शिक्षण क्षेत्र निवडण्याचा मात्र एका झटक्यात घेतला त्यामुळे त्यावेळी कोणत्याही अडचणी आल्या नाहीत.असे शिक्षक योगेश सांगतात.

अविस्मरणीय प्रसंग/क्षण:

6 वर्षांत अनेक अविस्मरणीय अनुभव प्राप्त झाले, लाभले, घेतले असे शिक्षक योगेश सांगतात. यापैकी एक त्यांनी शेअर केला, 2018-19 मध्ये INSPIRE AWARD विज्ञान प्रदर्शनासाठी त्यांनी भरलेल्या 5 प्रवेश अर्जांपैकी 2 प्रतिकृती जिल्हास्तरावर निवडल्या गेल्या. विद्यार्थ्यांना यासाठी 10,000 रुपये प्रत्येकी प्राप्त झाले. मिणचे हायस्कूल, कोल्हापूर येथे 3 दिवस प्रदर्शनात सहभाग घेतला. आणि त्यातील एक प्रतिकृती राज्यस्तरावरील प्रदर्शनासाठी निवडली गेली. शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच शाळेचे विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनासाठी राज्यस्तरावर जात होते. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या जिल्ह्यातील श्री. खेडकर सर व श्री. टाकळे सर यांच्या शाळेचे विद्यार्थी ही होते. तेव्हा त्यांचा प्रवास सांगली येथील महाडिक अभियांत्रिकी इन्स्टिटय़ूटमध्ये संपला. मात्र तिथपर्यंत त्यांना खूप काही शिकायला, अभ्यासायला मिळाले असे ते म्हणतात.

अचीवमेंट:

अवघ्या 3 वर्षात विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून मिळालेली ओळख ही आत्तापर्यंत त्यांची सर्वात मोठी  Achievement आहे. त्यांचे जवळपास सर्वच विद्यार्थी आजही संपर्कात आहेत. त्यामुळे शिक्षक म्हणून ते त्यांचे काम अतिशय योग्य पार पाडले याची ही पोच पावतीच आहे.असे ते म्हणतात.

शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज वाटते:
समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी आवश्यक 2 बदल शिक्षक योगेश यांनी मांडले.
1. शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते आई-मुलाप्रमाणे असते हे आता समाजाने मान्य करावे. शिक्षक विद्यार्थ्यांचे हित सर्वप्रथम पहातो त्यानंतर स्वहित. त्यामुळे शिक्षकांना पालकांचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे.

2. शिक्षक सातत्याने अद्ययावत राहिला पाहिजे. त्याने विद्यार्थी घडवताना आधुनिकतेची कास धरली पाहिजे. यासाठी समाजकारण्यांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. देश समृद्ध करण्यासाठी विद्यार्थी समृद्ध घडवावा लागतो याचे भान शिक्षकांसोबतच समाजाला असणे गरजेचे आहे.

शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांना सल्ला:
ज्यांना शिक्षक व्हायचे असेल त्या प्रत्येकाने स्वतःला कायम विद्यार्थी रहावे. स्वतःच्या अडचणींना तोंड देत विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात. समाजाभिमुख बनावे.