S R Dalvi (I) Foundation

डिजिटल शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य

Digital learning and students’ mental health

आपल्या देशात एक काळ होता जेव्हा पालक आपल्या मुलांना शिक्षण आणि चांगले संस्कार देण्यासाठी गुरुकुल मध्ये पाठवत असत. लहानपणापासून तर 24 वर्षाच्या वयापर्यंत विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असे. त्याला पुस्तकी अभ्यासासोबात अध्यात्मिक संस्कार आणि शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देखील दिले जायचे. शिक्षणाच्या या प्रक्रियेला गुरुकुल पद्धती म्हटले जायचे. नंतरच्या काळात आधुनिक प्रगती झाली. शिक्षणाच्या पद्धती बदलून इंग्रजी शाळा व महाविद्यालये देशात आली. आज देशातील सर्वच विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत आहेत आणि गुरुकुल पद्धती पूर्णपणे नाहीशी झाली आहे. परंतु मागील पाच वर्षात झालेल्या इंटरनेट क्रांतीमुळे देशात डिजिटल शिक्षणाची सुरुवात झाली आहे. विद्यार्थी घरबसल्या ऑनलाईन शिक्षण प्राप्त करीत आहेत. यातच भर म्हणजे मागील वर्षी आलेली जागतिक महामारी Covid 19 होय. या एक वर्षात देशातील ऑनलाईन शिक्षण मोठ्या प्रमाणात वाढले.

ऑनलाइन शिक्षणाच्या दिशेने घाईत उचलल्या गेलेल्या या अनियोजित पावलामुळे ‘डिजिटल उपलब्धता’ नसलेला एक मोठा वर्ग या आभासी वर्गांबाहेर फेकला गेला आहे. ऑनलाइन शिक्षण मुठभर सुदैवी मुलांनाच मिळाले आहे, कारण, भारतातील केवळ २४ टक्के कुटुंबांकडे स्मार्टफोन्स आहेत. ५ ते १८ या वयोगटातील मुले असलेल्या केवळ ११.५ टक्के घरांमध्ये कम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन आहे. मात्र, या सर्वांचे आयुष्य कॅव्हिड काळात घरापुरते संकुचित झाले. ऑनलाइन शिक्षणाला आधुनिक शिक्षणाचे नवीन स्वरूप म्हटले जाऊ शकते. ज्यात विद्यार्थ्यांना लांब प्रवास करून शाळेत फळ्यासमोर बसण्याऐवजी घरबसल्या लॅपटॉप वरूनच शिक्षकांशी संपर्क करता येतो. या शिक्षणासाठी आवश्यकता एवढीच आहे की विद्यार्थ्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन आणि मोबाईल / कॉम्प्युटर अथवा लॅपटॉप असायला हवे. आज शाळा, कॉलेज तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी कोचिंग साठी घराबाहेर न जाता, घरीच राहून निश्चिंतपणे शिक्षण घेत आहेत. या शिक्षणामुळे दूर शाळा असणाऱ्या विद्यार्थ्याला लागणारा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचतो. विदेशात शिक्षणाची ईच्छा असूनही आर्थिक परिस्थिती ठीक नसणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा फायदा झाला आहे. ऑनलाईन शिक्षणात आपण आपल्या वेळेनुसार योग्य वेळ निवडून लेक्चर करू शकतो.

ऑनलाईन शिक्षणात वेळ आणि पैसा दोघींची बचत होते. परंतु असे म्हटले जाते की कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. ऑनलाइन शिक्षणाचे देखील तसेच आहे. जसे एकीकडे याचे फायदे आहेत त्याच पद्धतीने अनेक नुकसान व दुष्परिणाम देखील आहेत. आपल्या देशात अजूनही अनेक खेड्या गावात इंटरनेट उपलब्ध नाही आहे व ज्या लहान शहरांमध्ये इंटरनेट आहे तेथे त्याची गुणवत्ता फार चांगली नाही आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी योग्य नेटवर्क ची आवश्यकता असते. ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने व्हिडिओ थांबणे, आवज ऐकू न येणे किंवा व्हिडिओ अडकणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची कमतरता निर्माण होते. आधी शाळेत गेल्यावर शिक्षेचे भयाने विद्यार्थी लक्ष देऊन शिक्षकांचे शिकवणे ऐकत असे. परंतु ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी काय करत आहे हे शिक्षकांना दिसत नाही. ज्यामुळे विद्यार्थी बेशिस्त होतात आणि कित्येकदा ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेत नाहीत.

व्यवहारीक अनुभव आणि प्रात्यक्षिके ही शिक्षणाच्या दृष्टिने खूप महत्त्वाची आहेत. ऑनलाईन शिक्षणात जास्त करून प्रात्यक्षिकांचा आभाव दिसून येतो. या शिक्षणात ॲनिमेटेड व्हिडिओ चा उपयोग केला जातो. शाळेत विद्यार्थी भौतिक वस्तूंचे निरीक्षण करून अभ्यास करतात. हा प्रात्यक्षिक स्पर्श त्यांना अभ्यासाविषयी आवड निर्माण करतो. परंतु ऑनलाईन शिक्षणात याची कमी असते. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होत नाही. या शिवाय तासन्तास मोबाईल अथवा लॅपटॉप स्क्रीन समोर बसून विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास निर्माण व्हायला लागतात. डोके दुखी, डोळ्यात आग होणे व थकवा येणे यासारख्या शारीरिक समस्या तर चिडचिडेपणा या सारख्या मानसिक समस्या निर्माण होतात.

कोविडनंतरच्या काळामध्ये शालेय शिक्षणाचा नव्याने शोध घेताना मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहील याचाही विचार व्हायला हवा. त्यासाठी वेगळे धोरण हवं आणि निधीची उपलब्धताही. पालक, शिक्षक आणि मुलांशी संबंधित इतर मोठी माणसं, संस्था यांना मुलांच्या नवीन मानसिक गरजा समजावून सांगितल्या पाहिजेत आणि त्यांच्याशी वागण्याची, बोलण्याची त्यांना शिकण्याची नवीन पद्धतीही अवलंबली पाहिजे. मूळात मानसिक स्वास्थ्य गरजेचं आहे याची जनजागृती महत्त्वाची आहे. एखाद्याला मानसिक आजार असेल तर त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी असा आत्मविश्वास मुलं आणि पालकांमध्ये निर्माण व्हायला हवा. मानसिक त्रास, आजार म्हणजे काहीतरी चुकीचं असून ते लपवून ठेवलं पाहिजे ही भावना कमी व्हायला हवी. शाळांमध्ये मुलांशी मोकळा संवाद साधला गेला पाहिजे. थोडा अभ्यास कमी झाली तरी चालेल. पण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याला प्राध्यान्य देणं ही काळाची गरज आहे. मुलांना अभ्यासाबरोबर मोकळा श्वास घेऊ द्या आणि मुक्तपणे वावरू द्या.

Scroll to Top