S R Dalvi (I) Foundation

उत्सव दहीहंडीचा, गोविंदा आला रे आला…

Dahihandi Festival, Govinda ala re ala…

श्रावण महिन्यात मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी म्हणजे कृष्ण जन्म दिवस साजरा केला जातो. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी साजरा केला जाणारा अतिशय प्रसिद्ध सण आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या निमित्ताने प्रथम श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते आणि त्यानंतर दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.

संपूर्ण भारतात दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी भारतातील विविध ठिकाणे धार्मिक पद्धतीने सजवली जातात. आजच्या या महोत्सवात सहभागी होण्यासाठी येथील तरुणाईचा उत्साह नजरेसमोर येतो. ही दहीहंडी तोडण्यासाठी एकापाठोपाठ एक तरुणांचे अनेक पथक प्रयत्न करतात. यावेळी महाराष्ट्राच्या अनेक भागात ‘गोविंदा आला रे’चा आवाज ऐकू येतो, म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचे आगमन झाले आहे. मथुरा हे श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे. त्यामुळे मथुरेत हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देशभरातील विविध कृष्णभक्त येथे जमतात आणि हा उत्सव श्रद्धे भावनेने साजरा करतात. यावेळी संपूर्ण मथुरा अशा प्रकारे सजवली जाते की तिची सुंदरता खूप वाढते. संपूर्ण नगर कान्हा भक्तीने दैदिप्यमान होतो. श्रीकृष्ण भक्तांसाठी वृंदावन हे एक अत्यंत पवित्र स्थान आहे. येथे श्रीकृष्णाची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांद्वारे जवळपास संपूर्ण वृंदावनात दहीहंडीचा उत्सव आयोजित केला जातो, जेणेकरून लोकांना कृष्णलीलेचा आनंद घेता येईल.

आज दहीहंडीचा उत्सव राज्यभर आज साजरा केला जात आहे. आज मानाच्या हंड्या फोडण्याचा मान कोणतं मंडळ जास्त पटकावणार, सर्वात जास्त मानवी थर लावण्याचा मान कोणत्या मंडळाला जाणार, अशा अनेक गोष्टींसाठी आज गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळते. बाळकृष्णाने ही परंपरा सुरु केली. भगवान श्रीकृष्णांना लोणी अत्यंत प्रिय होतं. आणि लोणी खाण्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असे. ते पाहून इतर घरातल्या गवळणी आपापल्या घरातलं लोणी घराच्या छतावर बांधून ठेवत असत. मात्र आपल्या सवंगड्यांच्या मदतीनं ते लोणी कृष्ण काढत असे आणि सर्व सवंगडी त्या लोण्याच्या गोळ्याचा आस्वाद घेत असत. अनादी कालापासून हीच परंपरा आजही सुरू आहे. आज हेच सवंगडी एकत्र येतात. काही महिन्यांमध्येच मानवी थर लावण्याचा सराव करतात आणि मग दहीहंडीच्या दिवशी ही गोविंदा पथकं मुंबई, ठाणे,पुणे,नाशिक,औरंगाबाद,कोकण अशा आपल्या आसपासच्या अनेक जिल्ह्यात फिरतात. उंच लटकवलेली दहीहंडी फोडतात आणि तो आनंद साजरा करतात.

दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा गटातील लोक जखमी होतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा सण साजरा करताना लोकांना अशा जखमा होऊ शकतात की त्यांचा मृत्यू होऊ शकतो.२०१२ मध्ये सुमारे २२५ गोविंदा जखमी झाले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यासाठी काही विशेष नियम केले आहेत. २०१४ मध्ये, महाराष्ट्र सरकारने १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला दहीहंडीमध्ये सहभागी होऊ न देण्याचे सांगितले. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने किमान वयोमर्यादा १८ वर्षे केली, त्यामुळे दहीहंडीत सहभागी होण्यासाठी किमान १८ वर्षे वय असणे अनिवार्य झाले. २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीमध्ये भाग घेता येणार नाही, असे म्हटले आहे. बालकामगार कायदा (१९८६) अंतर्गत १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडी स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही, असे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे. मात्र, दहीहंडीसाठी उभारण्यात येणाऱ्या ‘ह्युमन पिरॅमिड’च्या उंचीवर न्यायालयाने कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

खरंतर आज दहीहंडीच्या उत्सवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन काहीसा बदलला असला तरी अशक्यप्राय ध्येय गाठण्यासाठी किती खडतर परिश्रम करावे लागतात, हे याचि डोळा पाहाण्याची त्या युवकांना संधी आहे, जे छोट्याश्या आलेल्या अपयशाने खचून जातात, निराश होतात. मात्र अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे दाखवणारा दहीहंडीचा उत्सव आहे, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. जिद्द अंगी असेल तर अशक्य असं काही नाही याचा संदेश देणारा, हा दहीहंडीचा उत्सव म्हणूनच जीवनात गोडवा वाढवून जातो.  

Scroll to Top