S R Dalvi (I) Foundation

शिक्षकांनी ‘सुपर शिक्षक’ का असावे?

Why do teachers need to be “Super Teachers”?

शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, मुलांना जगण्याचे बळ देते. भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करायची असेल तर शिक्षकांना मुळात स्वतःला घडविण्याची, उत्तुंगतेची आस असली पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य आशावाद असला पाहिजे. कठोर वास्तवाला सामोरे जाण्याची जिद्द असायला हवी. शिक्षकांसाठी रोजचा दिवस हा शिक्षक दिन असला पाहिजे. तरच चांगले विद्यार्थी घडविले जाऊ शकतात. शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो.

शिक्षकांनी मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार,नीतीमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची असते कारण त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहेत. प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज, बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील प्रकट अवगुण आणि सुप्त गुण हेरून त्याच्या व्यक्तीमत्वाला आकार द्यायचा असतो.
विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांच्या मनात अनेक तक्रारी असतात. मुलं कच्ची आहेत, ती अस्वच्छ राहतात, गैरहजर रहातात. गृहपाठ करीत नाहीत, दंगा करतात, अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात वगैरे वगैरे. विद्यार्थ्यांबाबतचा हा नकारात्मक दृष्टिकोन कमी करण्यासाठी शिक्षकांनी आत्मपरिक्षण करणे जरुरीचे आहे. समस्या असणारच, मात्र, कौशल्याने त्यांच्या मुळाशी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देणे, त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे, प्रकल्प राबविणे आवश्यक आहे.

शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असून त्यांचा एकमेकांवर सतत परिणाम होत असतो. सध्याच्या माहितीच्या विस्फोटाच्या युगात शिक्षकांवरील जबाबदारी फार मोठी आहे. विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे कारण उद्याचा समाज हा सतत शिकत राहणार आहे. यासाठी शिक्षकांची कार्यत्परता खूप महत्वाची आहे. शिक्षकांच्या छोट्य़ा-मोठ्या कृतीतून हे संस्कार जोपासण्यासाठी शिक्षक मातृहृदयी हवा. यामुळे मुलांचे दडपण कमी होते व आनंददायी शिक्षण होते. वर्गातील वातावरण प्रेरक होते.

शिक्षकांचे वक्तीमत्व जेवढे प्रभावी, परिणामकारक, ज्ञान समृद्ध असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्या यांना सामारे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हे शिक्षकांनी आपले ध्येय समजले पाहिजे. स्वतःमधील उणिवा जाणीवपूर्वक दूर करणारा शिक्षकच आपले अध्यापनाचे कार्य अधिक प्रभावी, रंजक आणि सुलभपणे करू शकतो. विद् म्हणजे जाणणे, जो खूप जाणतो तो विद्वान. शिक्षक इतर बाबतीत विद्वान असो वा नसो आपल्याला जे शिकवायचे आहे त्या विषयात तो विद्वान असलाच पाहिजे. 
शिक्षकाने वाचन प्रिय पाहिजे. स्वतःचा ग्रंथसंग्रह असणे आवश्यक आहे. आपले ज्ञान अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यामुळे कामात निर्माण होणारे कोणतेही प्रश्न हाताळण्याची सूत्रे आपल्याला उपलब्ध होतात. शिक्षकाने नेहमी चिंतनशील असावे. कोणत्याही समस्येची उकल होण्यासाठी सखोल चिंतनाची आवश्यकता असते. शिक्षकाने चर्चा करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाच्या, बेशिस्तीच्या समस्या एकट्याने सोडवण्यापेक्षा सांघिक पद्धतीने सोडवाव्यात. इतरांची मने जाणून घेण्यासाठी समस्या हाताळण्याचे नवे तंत्र हाती येऊ शकते. आपल्या समस्या, अडचणी यांच्या नोंदी ठेवण्याची सवय शिक्षकांमध्ये आसायला हवी. आपल्या लेखनातून, पथनाट्यातून, एकांकिका, कथा, गीते, कविता, लेख यातून शिक्षक आपल्या समस्या मांडू शकतात. यातून त्यांच्या विचारांची तीव्रता इतरांना कळते. त्यावर चर्चा होते आणि समस्यांचा चक्रव्यूहातून मार्ग शोधला जातो.

शिक्षकाने स्वत: शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. इतरांना शिकवणाऱ्याने सतत शिकत राहायला हवे. त्याची शिकण्याची प्रक्रिया कधीही बंद पडू नये शिक्षकांनी आयुष्याच्या अंतापर्यंत विद्यार्थी म्हणूनच जगायला हवे. त्यांनी शिकण्याची इच्छा कधीही मरू देता कामा नये. कोणतीही शिक्षण योजना शिक्षकाशिवाय राबविली जाऊ शकत नाही म्हणून शिक्षणाशी संबंधित सर्व विषयावर त्याचे सखोल चिंतन हवे.

शिक्षक ही केवळ व्यक्ती नसून संस्काराचे एक विदयापीठ असते. शिक्षक साहसी, धैर्यवान, परोपकारी, निरपेक्ष वृत्तीचा असावा. त्याच्या प्रत्येक कामात रेखीवता व वाणीत मधुरता असावी. त्याची राहणी साधी व विचारसरणी उच्च असावी. दर्जाचा शिक्षक ‘स्पष्टीकरण करतो’ एक चांगला शिक्षक प्रात्यक्षिक करतो. आणि खरा थोर शिक्षक प्रेरणा देतो. विदयार्थी घडवून एक संवेदनशील नागरिक घडविणे व अशा नागरिकांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती व मनुष्य निर्माणाचे कार्य करून शिक्षक हा ख-या अर्थाने सृजनाचा साधक होऊ शकतो.

2 thoughts on “शिक्षकांनी ‘सुपर शिक्षक’ का असावे?”

  1. वर्षा घाग

    थँक्स ,शिक्षक म्हणून घेतलेला हा वसा कायम कार्यतत्परते जपून उत्तम पिढी घडविण्यासाठी अशाच सूपर शिक्षकांची गरज आहे …..खूप छान लिहिलंय

Comments are closed.

Scroll to Top