S R Dalvi (I) Foundation

बोर्डाच्या विद्यार्थ्यांना आजकाल एवढे टक्के कसे काय मिळतात?

How do board students get such a percentage these days?

‘काबिल बनो कामयाबी अपने आप तुम्हारे पीछे आएगी’ 3 इडियट्स सिनेमातला हा डायलॉग तुम्हाला आठवतो का? साधारण 7-8 वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या कुणाच्याही दहावी, बारावीच्या बॅचमध्ये इतक्या संख्येनं विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण का मिळत नव्हते? “आपल्या काळात का नाही मिळाले आपल्याला 90 टक्के गुण? तेव्हा तर 80 टक्क्यांच्या घरात असलेला विद्यार्थी बोर्डात यायचा. त्याकाळी आम्ही फर्स्ट क्लास मिळवला हेच खूप होतं. आपल्या शिक्षण पद्धतीत आजही काही चुकतंय का? या शिक्षण पद्धतीमुळे खरंच मुलं सक्षम बनत आहे की केवळ पाठांतर सुरू आहे? की खरंच गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना हे मार्क मिळतायत?

मुलांना सहा विषयांपैकी ज्या पाच विषयांना उत्तम मार्क मिळालेत, त्यांच्या बेरजेला पाचाने भागून गुणांची टक्केवारी काढली जाते. सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशातील सरशी पाहता आघाडी सरकारच्या काळात ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ हे पॅटर्न लागू करण्यात आले. शिवाय, पूर्वीप्रमाणे आता बोर्डाच्या सर्व विषयात केवळ लेखी परीक्षेच्या आधारे गुण दिले जात नाहीत, तर प्रत्येक विषयासाठी 20 गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाते.

आता स्टेट बोर्डातही प्रत्येक विषयाचे अंतर्गत मूल्यमापनाचे 20 टक्के गुण शाळांच्या हातात असतात. शाळेत विज्ञानाची धड प्रयोगशाळा नसली, तरी विज्ञानात प्रात्यक्षिक परीक्षेत जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेले पाहून ही किमया नेमकी कशाची, याचे राहून राहून नवल वाटत राहते. शाळांमध्येच शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना गुणांची खैरात वाटण्यात येते असं खुद्द शिक्षकच सांगतात. ज्याची पात्रता 20 गुण मिळवण्याचीही नसते, त्याला हे गुण सहज मिळतात. तोंडी परीक्षेला कोणते प्रश्न विचारण्यात येतील याचीही साधारण कल्पना मुलांना असते. त्याचा रट्टा मारला की शिक्षक गुण देतात. पण हे योय आहे का? असा वाटत नाही का की इथे मुलांची फसवणूक होत आहे?

मुलांना मिळत असलेले 90 – 98 टक्के गुण हे गुणवत्तेच्या आधारावर मिळत आहेत, असंच मुलांना वाटते. मग बारावी आणि त्यापुढील प्रवेश परीक्षांमध्ये असा काय बदल होतो की विद्यार्थ्यांच्या हाती निराशा येते?” JEE,NEET यांसारख्या परीक्षेत मुले अपेक्षित स्कोअर का करू शकत नाही? शिक्षण तज्ज्ञांच्या मते, दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत भरघोस मार्क मिळाले याचा अर्थ JEE, NEET अशा प्रवेश परीक्षेत तितकेच चांगले मार्क मिळतील असे नाही.
दहावी बोर्डाच्या परीक्षेत पाठांतराच्या आधारावर विद्यार्थी मार्क्स मिळवतात. बारावी परीक्षेनंतर प्रवेश परीक्षांमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न अधिक असतात. त्यामुळे जर मुलांना संकल्पना कळाल्या असतील, विषय समजला असेल तरच त्यात मुले स्कोअर करू शकतात. परंतु JEE,NEET परीक्षांचे स्वरुप वेगळे आहे त्यामुळे प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी वेगळी तयारी करावी लागते.

1970, 1980 अगदी 90 च्या दशकातही 70-85 टक्के गुण मिळवणं म्हणजे त्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली जायची. “कारण पूर्ण गुण द्यायचे नाहीत. आता 90 टक्के मिळाले तरी अनेकदा पालक आपल्या मुलांच्या निकालावर समाधानी नसतात, असं चित्र दिसते. गेल्या काही वर्षात CBSE शाळांची संख्या शहरांपासून ते अगदी ग्रामीण भागातही झपाट्याने वाढली. त्यामुळे राज्य शिक्षण बोर्डाच्या (SSC) बोर्डाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाली. CBSE शाळांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना नव्वदीपार मिळणाऱ्या गुणांमुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशी भावना बोर्ड आणि शिक्षकांमध्ये कालांतरानं रुजू झाली. बोर्डांमध्ये स्पर्धा आहे हे सत्य नाकारता येणार नाही. अकरावीमध्ये आपल्या मुलांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा असंच शिक्षकांनाही वाटते. मग आपल्या मुलांना संधी मिळायला हवी या हेतूने स्पर्धा सुरू झाली.

“ही खरी गुणवत्ता आहे का? तर नाही. कारण ही शिक्षण व्यवस्थेने केलेली सोय आहे. मार्क देताना तटस्थपणे विचार केला जात नाही. त्यामुळे पात्रता नसतानाही विद्यार्थ्यांना मार्क मिळत आहेत. हे प्रश्न केवळ एक शिक्षक नाही तर असे अनेक शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि पालकही उपस्थित करत आहेत. वर्षानुवर्ष ठरलेले प्रश्न, उत्तर लिहिण्याची ठरलेली पद्धत, कोचिंग क्लासकडून एका ठराविक पॅटर्नमध्ये विद्यार्थ्यांकडून करवून घेतली जाणारी तयारी, अशा सर्व बाबींचा परिणाम आपल्याला निकालामध्ये दिसतो. “अपेक्षित प्रश्नांची अपेक्षित उत्तरे दिली की गुण मिळतात. हे शास्त्र कोचिंग क्लास कडून विद्यार्थ्यांनी चांगलंच शिकून घेतलंय. हा ‘फॉर्म्युला’ वापरला की गुण मिळणार हे विद्यार्थ्यांनाही कळून चुकलंय. शिक्षकांच्याही हे लक्षात येतंय. ही मुल्यांकन पद्धती बदलण्याची गरज आहे असं मत शिक्षकांकडूनही व्यक्त केलं जात आहे. पण त्यासाठी राज्य सरकारचा शिक्षण विभाग, राज्य शिक्षण मंडळांकडूनही प्रयत्न होणं अपेक्षित आहे. पाठांतरापेक्षा आकलनावर अधिक भर देणारी शालेय शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आली, की यातले अनेक प्रश्न मार्गी लागतील.

महाराष्ट्रात घरोघरी कोचिंग क्लासचे फॅड आहे हे उघड आहे. कोचिंग क्लासची एकमेकांसोबत असलेली स्पर्धा आपल्याला नाक्यानाक्यावर लावलेल्या जाहिरातींच्या फ्लेक्सवरुनही लक्षात येते. आमच्या कोचिंगच्या अमुक इतक्या विद्यार्थ्यांनी 95 टक्के मिळवले असे फ्लेक्स विद्यार्थ्यांच्या फोटोसहीत लावलेले असतात. आता तर दहावीनंतर कनिष्ठ महाविद्यालयांना जोडलेले कोचिंग क्लास सुरू झालेत. विद्यार्थ्यांना JEE,NEET,CET या परीक्षांची तयारी करण्यासाठी महाविद्यालयात न जाता मुलं थेट कोचिंग क्लासला हजेरी लावत आहेत. कोचिंग क्लासवर पालकांचा प्रचंड विश्वास आहे. शाळांपेक्षा अधिक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या क्लासेसच्या माध्यमातून शिक्षणाचाही बाजार झालाय. हुशार विद्यार्थी कोचिंग क्लासकडे वळले पाहिजेत असाही प्रयत्न कोचिंग क्लास कडून केला जातो. केवळ कोचिंग क्लासच नव्हे तर खासगी शाळाही या स्पर्धेत मागे नाहीत. आपल्या शाळेचे अधिकाधिक विद्यार्थी 90 टक्क्यांच्या रांगेत आले पाहिजेत असा प्रयत्न शाळांकडूनही होताना दिसतो.

Scroll to Top