S R Dalvi (I) Foundation

वारस नोंद कशी करायची? वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

How to register an heir? How to apply online for heir registration?

शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद करणं आवश्यक असतं.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 3 महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. पण यासाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही. तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या ई-हक्क प्रणालीचा वापर करून घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करू शकता. हा अर्ज कसा करायचा, सरकारची ई-हक्क प्रणाली काय आहे, याचीच माहिती आपण पाहणार आहोत.

ई-हक्क प्रणाली
सर्वांत आधी पाहू या की ही ई-हक्क प्रणाली काय आहे ते. महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं शेतकऱ्यांना ऑनलाईन सुविधा पुरवण्याच्या हेतून ई-हक्क प्रणाली विकसित केली आहे. “ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी घरबसल्या 7 ते 8 प्रकारचे फेरफार अर्ज करू शकतात. यात सातबारावर बोजा चढवणे, कमी करणे, नाव दुरुस्त करणे, वारस नोंदी करणे, ई-करार करणे इत्यादी सेवांसाठी अर्ज करता येतो. तसंच अर्जाचं स्टेटसही चेक करता येतं.”

जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
हा अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर तुम्हाला खालच्या बाजूला एक सूचना दिसेल -“७/१२ दुरुस्तीसाठी ई हक्क प्रणाली”, अशी ही सूचना असून त्याखाली एक लिंक दिलेली आहे.

https://pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ नावानं एक पेज ओपन होईल.

यावरील ‘Proceed to login’ या पर्यायावर क्लिक केलं की तिथं तुम्हाला आधी तुमचं अकाऊंट सुरू करायचं आहे. त्यासाठी ‘Create new user’ यावर क्लिक करायचं आहे. मग ‘New User Sign Up’ नावाचं नवीन पेज उघडेल.

थं तुम्हाला सुरुवातीला तुमचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर लॉग-इन डिटेल्समध्ये Username टाकून check availability या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पासवर्ड टाकून तो परत एकदा टाकायचा आहे. मग Security Questions मध्ये एक प्रश्न निवडून त्याचं उत्तर द्यायचं आहे.

ही माहिती भरून झाली की पुढे मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पॅन कार्ड नंबर आणि पिन कोड टाकायचा आहे. पिन कोड टाकला की देश, राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येईल. त्यानंतर Select Cityमध्ये तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे.

त्यानंतर Address Details मध्ये घर क्रमांक आणि गल्लीचं नाव किंवा घरावर काही नाव असेल तर ते टाकू शकता.

सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे. इथं असणारे आकडे किंवा अक्षरं जशीच्या तशी पुढच्या कप्प्यात लिहायची आहे, आणि मग सेव्ह बटन दाबायचं आहे.

त्यानंतर या पेजवर खाली ‘Registration Successful. Please Remember Username & Password for Future Transaction.’ असा लाल अक्षरातला मेसेज तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला ‘Back’ या पर्यायावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करायचं आहे. आता आपण नोंदणी करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग-इन म्हणायचं आहे.

त्यानंतर ‘Details’ नावाचं एक पेज तुमच्यासमोर उघडेल. इथं Registration, Marriage, e-filing, 7/12 mutations असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील. याचा अर्थ इथं तुम्हाला या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यातल्या ‘7/12 mutations’ वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुम्हाला यूझरचा प्रकार निवडायचा आहे. सामान्य नागरिक असाल तर ‘User is Citizen’ आणि बँकेचे कर्मचारी असाल तर ‘User is Bank’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

एकदा यूझरचा प्रकार निवडला की त्यानंतर ‘Process ‘ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर ‘फेरफार अर्ज प्रणाली- ई-हक्क’ नावाचे पेज ओपन होईल.

इथं सुरुवातीला गावाची माहिती भरायची आहे. जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे.

त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की, “तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा,” असा मेसेज तुम्हाला दिसेल.

आता आपल्याला वारस नोंद करायची असल्यामुळे आपण “वारस नोंद” हा पर्याय निवडला आहे.

त्यानंतर वारस फेरफार अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं तुम्हाला सुरुवातीला अर्जदाराची माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, वडील किंवा पतीचं नाव आणि आडनाव, अर्जदाराचा ईमेल आणि मोबाईल नंबर टाकून ‘पुढे जा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर स्क्रीनवर आपला अर्ज मसूदा जतन केला आहे असा मेसेज येईल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक दिलेला असेल, या मेसेजखालील ‘ओके’ बटनावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर मयताचे नाव किंवा खाते क्रमांक टाकायचा आहे, सातबाऱ्यावरील खाते क्रमांक इथं टाकणं अपेक्षित आहे.

पुढे ‘खातेदार शोधा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मयताचे नाव निवडायचं आहे.

एकदा ते नाव निवडलं की संबंधित खातेदाराच्या नावे असलेला गट क्रमांक निवडायचा आहे.

नंतर मृत्यू दिनांक टाकायचा आहे.

त्यानंतर ‘समाविष्ट करा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग निवडलेल्या खातेधारकाच्या जमिनीची सविस्तर माहिती तुम्हाला तिथं पाहायला मिळेल.

त्यानंतर अर्जदार हा वारसांपैकी आहे का? असा प्रश्न तिथं विचारण्यात येईल. तुम्ही वारसांपैकी असाल तर होय, नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर वारसांची नावे भरा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

इथं आता तुम्हाला वारस म्हणून जी नावं लावायची आहेत, त्यांची माहिती भरायची आहे. यात नाव, वडील किंवा पतीचं नाव, आडनाव लिहायचं आहे. पुढे धर्म निवडायचा आहे, तुमच्या धर्मानुसार वारस कायद्याचे नियम पाळले जातात. त्यानंतर इंग्रजीत नाव लिहायचं आहे आणि मग जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर तुमचं वय आपोआप तिथं येईल. पुढे मोबाईल नंबर आणि पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकला की राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येईल.

पुढे पोस्ट ऑफिस निवडायचं आहे. त्यानंतर तालुका, गाव, घर क्रमांक आणि गल्लीचं नाव टाकायचं आहे. पुढे मयताशी असलेलं नातं निवडायचं आहे.

मुलगा, मुलगी, विधवा पत्नी, नातू, नात, सून – जे नातं असेल ते निवडायचं आहे. यापैकी नाते नसल्यास सगळ्यात शेवटच्या यापैकी नसल्यास या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि मग वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 आणि वर्ग-4मध्ये दिलेल्या नात्यांपैकी एक नातं तुम्ही निवडू शकता.

ही सगळी माहिती भरून झाली की, साठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर खालच्या रकान्यात तुम्हाला आता वारसासंदर्भात भरलेली माहिती तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर दुसऱ्या वारसाचं नाव नोंदवायचं असेल तर तिथं असलेल्या पुढील वारस या पर्यायावर क्लिक करायचं आणि आता जशी माहिती भरली तशीच माहिती त्या वारसासंदर्भात भरायची आहे आणि साठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

अशारितीनं सगळ्या वारसांची नावे भरून झाली की पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि कागदपत्रे जोडायची आहे.

इथं तुम्हाला मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करायची आहे . ही प्रत ग्रामपंचायत कार्यालयात मिळते. इतर कागदपत्रांमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती देण्याहेतूनं रेशन कार्ड जोडू शकता. मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीचे ८ अचे उतारेही तुम्ही जोडू शकता.

तसंच एका कागदावर एक शपथपत्रं लिहून ते इथं जोडणं अपेक्षित असतं. यात मृत व्यक्तीच्या सगळ्या वारसांची नावं, त्यांचा पत्ता नमूद करणं गरजेचं असतं.

कागदपत्रे जोडल्यानंतर तिथं फाईल अपलोड झाली असा मेसेज येतो.

त्यानंतर तुम्हाला तिथं एक स्वयंघोषणपत्र दिसेल.

अर्जात दिलेली माहिती योग्य व अचूक असून त्यामध्ये माहित असलेले कोणतीही बाब लपवुन ठेवलेली नाही अथवा चुकीची नमूद केलेली नाही, असे केले असल्यास मी भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 177 , 193 , 197 , 198 , 199 आणि 200 अन्वये दंडात्मक / कायदेशीर कारवाईकामी पात्र राहील याची मला जाणीव आहे, म्हणून हे स्वयंघोषणपत्र करत आहे. अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे सत्यप्रत असल्याबाबत स्वयंस्वाक्षरीत केले आहेत.

अशा आशयाचं हे पत्र असतं.

सगळ्यात शेवटी या पत्राच्या खालील सहमत आहे/Agree या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वारस नोंदीसाठाचा तुमचा अर्ज गावातल्या तलाठी कार्यालयात सबमिट केला जाईल.

त्यानंतर तिथं या अर्जाची छाननी केली जाते आणि पुढील प्रक्रिया करून सातबारा उताऱ्यावर वारसांची नावं नोंदवली जातात.

Scroll to Top