S R Dalvi (I) Foundation

“श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा” मराठा साम्राज्याचा विस्तारक व महान कर्तुत्वाचा धनी…

"Shrimant Thorle Bajirao Peshwa" the expander of the Maratha empire and the owner of great achievements...

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विस्तार रुपात वाढविण्याचे व संरक्षित करण्याचे महत्वाचे कार्य केले ते पेशवा राजघराण्याने. साधारणतः मराठा कालखंडाचा कार्यकाळ पाहता यामध्ये शिवाजी राजांचा काळ त्यानंतर जवळपास ९ वर्षे संभाजी राजांचा मुघालासोबतचा अविरत लढा व नंतर सत्तेची सूत्रे त्यांचे पुत्र शाहू ह्यांच्या नावावर नामधारी रित्या पेशवा सेनापती ह्या पुण्याच्या घराण्याला देण्यापर्यंत असा करता येईल ह्याच पेशवा राजघराण्यात अनेक शूरवीर राजे होऊन गेले.

श्रीमंत बाजीराव पेशवा थोरला हे पेशवे घराण्यातील सर्वात कर्तबगार व स्वराज्य विस्तार दूरवर पसरविणारे पेशवा म्हणून इतिहासात उल्लेखित होते. अनेक कठीण व दुर्गम लढाई मध्ये यश संपादन करण्याची कुशल युद्धनीती ह्यामुळे बाजीराव पेशव्यांना नावलौकिक प्राप्त झाला. ह्याव्यतिरिक्त मराठा साम्राज्याची धास्ती दिल्ली दरबारापर्यंत पोहचविण्यात सुध्दा थोरले बाजीराव पेशवा ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. अटकेपार झेंडे लावण्याची मराठा साम्राज्याची महत्वाकांक्षा पूर्ण करणारा पेशवा म्हणून सुध्दा थोरले बाजीराव पेशव्यांचा उल्लेख केल्यास गैर ठरणार नाही.

थोरले बाजीराव पेशवा ह्यांचे वडिल बाळाजी विश्वनाथ हे सातारकर शाहू महाराजांच्या मराठा शासनाचे सेनापती व युध्द गतीविधीचे कुशल नेतृत्व संचालक होते. छत्रपती शाहू ह्यांनी स्वराज्य रक्षणाची संपूर्ण जबाबदारी आपल्या विश्वासू सेनापती बाळाजी विश्वनाथ ह्यांना देऊन सातारा येथून नामधारी शासन चालविण्याचा निर्णय घेतला. व येथूनच पेशवा राजघराण्याची सुरुवात झाली ह्यात बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवा झाले, बाळाजी विश्वनाथ ह्यांच्या मृत्युनंतर मराठा सत्तेची सूत्रे ईसवी सन १७२० साली त्यांचे पुत्र थोरले किंवा पहिले बाजीराव पेशवा ह्यांच्याकडे आली.

तडफदार वृत्ती, प्रसंगी निर्णय क्षमता, प्रभावी युध्द तंत्राचे ज्ञान ह्यामुळे शाहू राजे बाजीराव ह्यांच्यावर खुश होवून अवघ्या १३ व्या वर्षी बाजीरावला सत्ता सूत्रे देण्यात आली होती. मराठा साम्राज्याचे शिवधनुष्य पेलून शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा दूरवर विस्तार करण्याचा दृढसंकल्प मनात ठेवून थोरले बाजीरावने मोहीम आखणे सुरु केले.

सत्ता हाती येताच बाजीरावने हैद्राबादचा निजाम ज्याचा वारंवार मराठा शासनाला जाच होता त्याला अद्दल घडविण्याचा निश्चय केला व धडक मोहीम आखून त्याचा दारूण पराभव केला. ह्या व्यतिरिक्त जिंजीचा सिद्धी, गोव्याचा पोर्तुगीज, मुघल दरबारातील सेनापती व प्रांत सरदार ह्यांचा पराभव केला.

बाजीराव ने केवळ बाह्य शत्रूचा बिमोड करण्याचे धोरण स्वीकारले नाही तर मराठा साम्राज्यातील हितशत्रू व सातारा दरबारातील गद्दार सेवक ह्यांचा छडा लावून अंत केला. ह्या नेतृत्व गुणामुळेच बाजीराव एक सर्वांगीण गुण संपन्न नेतृत्व शासक म्हणून नावलौकिकास प्राप्त झाला.

बाजीराव थोरले ह्यांच्या शासन काळात मराठा साम्राज्य केवळ विस्तार पावत न्हवते तर त्याची संघ राज्यात्मक रचना सुध्दा झाली ह्यामध्ये जुने सरदार व प्रांत अधिकारी बदलून नव्या दमाचे तडफदार सेनानी भरती करण्यात आले व जबाबदाऱ्या नेमून देण्यात आल्या यामध्ये शिंदे,होळकर,पवार, जाधव ,फाळके , पटवर्धन आधी कुशल नेतृत्वाला स्थान देण्यात आले.

पालखेडला निजाम चा पराभव, छत्रसाल राजाच्या राज्यावर आक्रमण करणाऱ्या मोहम्मद शाह बंगश चा पराभव, जंजिराच्या चिवट सिध्दी चा पराभव इत्यादी काही महत्वाच्या मोहिमेत यश संपादन केल्याने थोरल्या बाजीराव ची कारकीर्द उत्तुंग भरारी घेणारी होती हे कळून येते.

एकंदरीतच सांगायचे झाल्यास बाजीराव थोरला पेशवा ह्यांनी चौफेर मराठा शासनाच्या शत्रूला पळता भुई कमी केली व पराभवाचे पाणी पाजले. मुघल दरबारातील नामी सेनापती व सरदार पराभूत झाल्याने ईतर शासक बाजीरावला वचकूनच राहत. बाजीराव च्या युध्द तंत्राची विदेशातील युध्द नेत्यांनी सुध्दा स्तुती केली यामध्ये जर्मनीच्या मोट्टगोमेरी ह्याच्या नावाचा उल्लेख इतिहासात आढळतो.

अश्या कर्तुत्ववान कुशल पेशव्यांचा २८ एप्रिल १७४० ला टायफाईड(नवज्वर) आजाराने मृत्यू झाला.

पेशवे राजघराण्यातील एक वेगळे प्रभावशाली व्यक्तिमत्व, कुशल नेतृत्व धारक व मराठा राज्य संरक्षक म्हणून बाजीरावची ओळख मराठा इतिहासात आहे. शिवरायांचा वारसा सांभाळत स्वराज्य बळकट करण्याचे महत्वपूर्ण कार्य पेशवा बाजीराव थोरला ह्यांनी प्रभावीरित्या पार पाडले. अश्या महान योद्ध्यांची कारकीर्द भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरलेली पहावयास मिळते.

Scroll to Top